दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पावसाने शेतकरी हवालदिल; संगमनेर तालुक्यात २२ घरांची पडझड, पत्रे उडाले, तारा तुटल्या
संगमनेर, : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने व वादळी वाऱ्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. २२ घरांसह जनावरांच्या दोन गोठ्यांची पडझड झाली, तसेच वीज अंगावर कोसळून चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.
डिग्रस येथे दोन आणि कौठे-धांदरफळ परिसरात दोन, अशा चार जनावरांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला. वादळामुळे २२ घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. आदिवासी कुटुंबांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. दोन जनावरांचे गोठेही पावसामुळे कोसळले आहेत. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामे पूर्ण केले आहेत. लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
मे महिना हा कडक उन्हाचा मानला जातो. मात्र यंदा पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, फळझाडे व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आधीच बाजारभाव नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवलं आहे. हवामानातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी नवे आव्हान ठरत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मे महिन्यात पाऊस होतोय, हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.