दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय ?
By Admin 2025-03-12
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर बसस्थानकाचा संपूर्ण परिसर 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून जाहीर
संगमनेर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असतानाच संगमनेरात मात्र त्याला नाराजीची किनार लागली आहे. तीथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी शिवसेनेच्यावतीने किल्ला उभारण्यासाठी तर, काँग्रेसप्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने 'शिवमंदिर' उभारण्यासाठी बसस्थानकावरील जागेची मागणी करण्यात आली होती. एकाच जागेसाठी दोन्ही बाजूने दावे करण्यात आल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. त्यातून मध्यममार्ग काढण्याचे प्रयत्नही फोल ठरल्यानंतर प्रशासनाने आता दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर 'संवेदनशील क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रांताधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या परिसरात कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अथवा राजकीय कार्यक्रम किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रणित समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आल्याने संगमनेरातील शिवजयंतीचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.राज्यात तारखेनुसार आणि तीथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाल्यापासूनच तीथीनुसारच्या उत्सवावर शिवसेनेचा पगडा राहीला आहे. यावेळी मात्र राज्यासह संगमनेरातही मोठे राजकीय उलटफेर घडल्याने तालुक्यात नवा राजकीय संघर्ष उभा राहु लागला आहे. आमदार सत्यजीत तांबे तालुक्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले असून त्यातूनच काँग्रेसने यावेळी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव (तीथीनुसार) साजरा करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी बसस्थानक परिसरातील जागेची मागणी केली होती.