दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर 2.0 जनतेच्या सहभागातून तयार होणार जाहीरनामा - आ. सत्यजीत तांबे यांची घोषणा - संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा
संगमनेर | दि. १० प्रतिनिधी
पत्रकार परिषदेत बोलताना आ. सत्यजीत तांबे म्हणाले, ‘आजवर संगमनेर शहराने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभागाच्या बळावर आदर्श विकासाचे मॉडेल उभारले आहे. आता वेळ आली आहे, संगमनेरला ‘दि बेस्ट’ बनवण्याची. आणि ते फक्त जनतेच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे.
आमदार तांबे यांनी शहराच्या आजवर झालेल्या वाटचालीचे पुनरावलोकन केले. त्यांनी सांगितले की, संगमनेर शहराच्या प्रगतीचा पाया म्हणजे दूरदृष्टी, नियोजन आणि पारदर्शक प्रशासन. आज संगमनेरमध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे दररोज स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, वृक्षारोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली. गेल्या 9 वर्षांत 27 कोटी रुपयांहून अधिक बक्षिसे आणि पुरस्कार संगमनेर नगरपरिषदेला मिळाले. स्वतंत्र स्टेडियम, नाट्यगृह, वीज सबस्टेशन, चौपदरी महामार्ग, रिंग रोड, एज्युकेशन हब हा सर्व आजवर केलेल्या विकासाचाच भाग आहे. संगमनेर शहरात 35 हून अधिक उद्याने, 25 हजार झाडे आणि 250 हेरिटेज वृक्ष आहे त्यामुळे शहराला गार्डन सिटी म्हणून ओळख मिळाली. “हा प्रवास भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभारामुळेच शक्य झाला,” असे तांबे यांनी ठामपणे सांगितले.
सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले की, “या वेळेसचा जाहीरनामा आम्ही ‘जनतेकडून, जनतेसाठी’ तयार करणार आहोत. कारण संगमनेरचा विकास हा फक्त निवडणुकीचा विषय नाही, तो प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि जबाबदारी आहे.” या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, महिला, नागरिक, सामाजिक संस्था आणि संघटना सर्वांकडून थेट सूचना मागविल्या जातील.
या संदर्भात शहरात “विकास परिषद” किंवा टाऊन हॉल मीटिंग्ज आयोजित केल्या जाणार आहेत, जिथे नागरिकांना आपले मत, कल्पना मांडता येतील. प्रत्येक क्षेत्रातील विषयतज्ज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार करेल.
चौकट १
संस्था–संघटना आणि नागरिकांशी थेट संवाद
संगमनेर 2.0 एक नवे स्वप्न, एक नवी दिशा