दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
प्रभाग 9 मध्ये सहमतीने उमेदवार
संगमनेर ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित स्थापन केलेली संगमनेर सेवा समिती ही राज्यघटना व समानतेचा विचार मानणारी आहे. मागील एक वर्षापासून संगमनेर शहर हे अस्वस्थ आणि असुरक्षित झाले आहे. या शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संगमनेर सेवा समिती कटिबद्ध असून या समितीच्या सर्व उमेदवारांना बहुजन विकास आघाडी जाहीर पाठिंबा देत असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
संगमनेर पावबाकी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी आमदार सत्यजीत तांबे, बहुजन विकास आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर निरीक्षक अजित ओरा, तालुकाध्यक्ष वैभव मोकळ, जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोकळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जावेद शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर दिवटे,प्रभाग 9 चे उमेदवार अमजद खान पठाण व श्रीमती विजयाताई जयराम गुंजाळ, अमित गुंजाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अनेक कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर 2.0 हे व्हिजन घेऊन समिती स्थापन केली. त्यामुळे चांगल्या कामाला पाठिंबा देण्याबरोबर संगमनेरला पुन्हा चांगले वैभव प्राप्त करून देण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे आहे. या समितीने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली असून संगमनेर मधील बाह्य आक्रमण,वाढलेली असुरक्षितता, अशांतता, अमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी सर्व नागरिकांनी संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.