दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर हे माझे आईबाप - पद्मश्री रघुवीर खेडकर
संगमनेर ( प्रतिनिधी ) तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ - उतार सुरू असताना देखील रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित केले. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यभरातील तमाशासह सर्व लोककलावंतांचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे संगमनेर मधील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.रावसाहेब कसबे, मा.आ. डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नूर मोहम्मद शेख, प्रा.एस.झेड.देशमुख, डॉ.सोमनाथ मुटकुळे, डॉ.संजय दळवी, हिरालाल पगडाळ,नामदेव गुंजाळ यांच्यासह रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय व संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरला कवी अनंत फंदी, लोकशाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्यासह लोककलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. अनेक अडचणींवर मात करून ही लोककला पुढे नेण्याचे काम रघुवीर खेडकर यांनी केले आहे. 1857 चा उठाव,भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही या लोककलाकारांचे मोठे योगदान राहिले आहे. कोरोना काळामध्ये रघुवीर खेडकर यांनी कलावंत सांभाळले. आज या मनोरंजन क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन आव्हाने पेलण्यासाठी रघुवीर खेडकर कायमसज्ज असतात त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संगमनेर करांसाठी अभिमानास्पद असून ते आता देशाचे कलावंत झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.