श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे संगमनेरात उस्फुर्त स्वागत     |      अज्ञात इसमाने दोन चारचाकी वाहने पेटविली     |      पावसाने शेतकरी हवालदिल; संगमनेर तालुक्यात २२ घरांची पडझड, पत्रे उडाले, तारा तुटल्या     |     
वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात.. By Admin 2025-05-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात..

संगमनेर  : संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे (ता. संगमनेर) येथील पाबळपठार भागात वादळाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यामुळे १२ आदिवासी कुटुंबांची घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे.
 या घटनेत एकूण १० लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
पाच ते सहा दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि अधूनमधून अवकाळी पावसाचे सत्र सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून यामुळे शेतमाल, घरबांधणी आणि जनावरांचे देखील मोठे नुकसान होत आहे. पाबळपठार परिसर हा डोंगर उतारावरील अतिदुर्गम भाग असून येथे वास्तव्यास असलेली आदिवासी कुटुंबे मजुरीवर उपजीविका करत आहेत. वादळामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले, काहींच्या घरांच्या भिंती पूर्णतः कोसळल्या. घरात ठेवलेले कपडे, धान्य, भांडीकुंडी, यांनाही वाऱ्याचा फटका बसला. अनेक कुटुंबांनी आरडाओरड करत घराबाहेर धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अंदाज नोंदवला. त्यानुसार एकूण १० लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्याच्या इतर भागांतही या वादळी हवामानामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळबागांना देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेकदा अवकाळी पावसामुळे शेतकरी व गरीब कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
डिग्रस गावात विजेचा कहर, दोन गायी ठार
तालुक्यातील दुसऱ्या टोकाला असलेल्या डिग्रस गावात विजांचा जोरदार गडगडाट सुरू असताना विज पडून केरू यशवंत खेमनर या शेतकऱ्याच्या दोन गायी जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी देखील खेमनर यांनी केली आहे.
पडझड झालेल्या कुटुंबांची नावे
संदीप भिमा मधे, सतिश भिमा मधे, चंद्रभान देवराम मधे, रमेश लक्ष्मण मधे, काशिनाथ किसन दुधवडे, निवृत्ती धोंडिबा मधे, भिमा लक्ष्मण मधे, बाजीराव रामा दुधवडे, सुनील चंद्रभान मधे, गेनूभाऊ महादू मधे, गजानन काशिनाथ शिंगोटे आणि आनंदा गबा मधे या बारा आदिवासी कुटुंबांचे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.